Saturday, March 5, 2011

मिशन हस्ताक्षर

सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले.  काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही. तेव्हा जरा भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली.

शाळेतील ते दिवस आठवले. पाचवी-सहावीला असताना माझे अक्षर म्हणजे शाळेत असताना एक अगम्य होतं. शिक्षक म्हणायचे कार्ट्या काय ह्या कोंबडीच्या नख्या काढल्यात. त्यामुळे कधी कधी गृहपाठाची वही
डोक्यात पडायची. हा नित्यनेम सातवीत जाईपावेतो असाच होता. सातवीला एका भल्या शिक्षकांनी मला अक्षर सुधारण्यावर भर दिला आणि त्या गुरुंच्या कृपेने माझे अक्षर अगदी दृष्ट लागण्याइतके सुरेख झाले.

तेव्हापासून ते शिक्षण पुर्ण होईपर्यंत माझे अक्षर अतिशय उत्तम राहिले. पण काही म्हणजे तीन-चार वर्षांपूर्वी जेव्हा आयटी क्षेत्रात प्रवेश केला आणि कळफलक बडवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझे अक्षर लेखन बिघडायला लागले. सुरुवातीला काही लक्ष दिले नाही. पण आता वाटतयं की काहीतरी गमावतोय.

सहज हातात पेन घेउन लिहण्याचा जरी प्रयत्न केला, तरी मी काही शब्द नीट लिहू शकत नाही. म्हणजे काय तर एकंदरीत मी माझी लिहण्याची क्षमताच गमावून बसलोय. मग पुन्हा एकदा अक्षरप्रपंच सुरु करावासा वाटला आणि त्याला सुरुवात करतोय, पुन्हा तीच ती जुनी शाईची लेखणी घेउन..

मग तुम्ही केव्हा सुरु करताय. लिखाण करायला.... शाईची लेखणी घेउन..


Wednesday, October 27, 2010

एडसचा जीवघेणा पाश

ही एक सत्य घटना आहे. मी स्वत: अनुभवलेली.

ही कथा आहे दहा वर्षापूर्वीची. जेव्हा मला मूळव्याधीच्या उपचारासाठी एका इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्या इस्पितळात एक मोठे दालन होते जिथे बहुतेक सर्व रुग्ण दाखल केले जात आणि मी पण तिथेच होतो.

मी तिथे डेरेदाखल झाल्यानंतर रोज एक वेगळा रुग्ण म्हणून मला जी वागणूक मिळाली ती खूपच चांगली होती. कारण काय तर मी एक वेगळा रुग्ण आणि विद्यार्थ्यासाठी एक अभ्यासाचा भाग होतो. म्हणूनच मला चांगली काय ती वागणूक मिळत होती आणि हे लक्षात यायला मला काही वेळ लागला नाही.

मी तिथे भरती झाल्यावर तिसरया दिवशी एक आणखी रुग्ण तिथे भरती झाला आणि त्या रुग्णाला सर्वांपेक्षा वेगळ ठेवण्यात आलं. त्या दिवशी मी ह्याच कारण कुणाला विचारलं नाही. पण निरीक्षण चालू ठेवलं आणि माझ्या ध्यानात आलं की त्या रुग्णाकडे कोणी लक्ष देत नाहीये.

मग मी सहज म्हणून एका इंटर्नशिप करणारया डॉक्टरला विचारून बघितलं आणि मला कळलं की तो रुग्ण एडसचा रुग्ण आहे. त्याच वय काय असेल. फक्त २४ आणि थोडी आणखी माहिती काढल्यावर कळले की त्याच लग्न झाले असून त्याला एक लहान मुलगी पण आहे. त्याला बघायला एव्हाना कुणी आलं नव्हत.

पहिल्या दिवशी त्याला उपहारगृहवाल्याने जेवण आणून दिले आणि जेव्हा तो एडसचा रुग्ण आहे हे कळले तेव्हा उपहारगृहवाला स्वत:च भीतीने आजारी पडला. त्यानंतर मात्र त्या रुग्णाची आबाळ होऊ लागली. कारण एव्हाना मला तपासताना डॉक्टर आणि इतर मंडळी उत्साहात यायची. पण त्यापैकी एकजण सुद्धा त्या रुग्णाकडे फिरकला नाही. मला हे बघून कसतरीच वाटलं आणि त्याक्षणी मला टीवी वर लागणारी एडसची जाहिरात आठवली.

"एडस छुने से नाही फैलता"- इति शबाना आझमी आणि इतर काही नट मंडळी.

एरवी नटनट्यांचे अंधानुकरण करताना आपल्याला काहीच वाटत नाही. पण रुग्णाची शुश्रुषा करायचं पुण्यकर्म करायला कोणी तयार नव्हत. पण फक्त प्रश्न पडून काय उपयोग. म्हणून मी जाऊन त्या रुग्णाची शुश्रुषा करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती जड आहे ते नंतर कळलं.

त्यानंतर मला डॉक्टर येऊन म्हणाले की तू तिकडे का गेलास? मी उत्तर दिले की तुम्ही पण जायला घाबरता का नाही हे सांगा अगोदर. आणि हे खर होत. डॉक्टर सुद्धा मनातून भ्यायले होते. प्रश्न मला पडला होता की ज्याने रुग्णाची व्यवस्था बघायची तोच असा पळपुटा आणि भेकड निघाला तर त्या रुग्णाने काय करायचे. त्यावेळेस तर जवळ जवळ त्या दालनातील प्रत्येकालाच अनामिक दहशत बसली होती. फक्त मी सोडून.

सलग तीन दिवस त्या रुग्णाची मी शक्य तितकी शुश्रुषा करत होतो. चौथ्या दिवशी त्याची बायको आणि लहान मुलगी दोघेही इस्पितळात आले.. त्याच्या बायकोकडून मला त्याचा इतिहास समजला. तो असा, रुग्ण मुलाचा पश्चिम बंगाल मधील सुवर्ण कारागीर होता आणि भुलेश्वरला दागिने घडवायचा कारखान्यात कामाला होता. तेव्हा मला कळले की रोगाचं मूळ कुठे आहे. त्या ठिकाणी वाईट संगतीमध्ये त्याला वेश्यागमनाची सवय लागली आणि केव्हा ह्या रोगाचा विळखा त्याला पडला हे त्यालासुद्धा उमजले नाही. त्याच काळात त्याचं लग्न झाले आणि एक गोड मुलगी सुद्धा झाली.

पण जेव्हा त्याच्या नातेवाईकांना हे कळलं की ह्याला जीवघेणा एडस झाला आहे. तेव्हा सर्वानीच साथ सोडली. साथीला होते तरी कोण. तर फक्त बायको आणि एक लहान मुलगी. इथे इस्पितळात त्या दोघींचीही एच आय व्ही टेस्ट केली गेली आणि ती टेस्टसुद्धा पोझीटीव निघाली. त्याचा बाहेरख्यालीपणा त्या दोन्ही निष्पाप जीवांनाही नडला होता.

इथे काय दोष होता त्या दोघींचा.. काहीच नाही. मग त्याने केलेल्या दुष्कृत्यांची शिक्षा त्या निष्पाप मायलेकीना का भोगावी लागणार होती? इथे हा प्रश्न मलाही पडला होता. पण ह्याच उत्तर मला कधी मिळणार नव्हतंच.

ही ब्लॉग पोस्ट "दीपज्योती" या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.

Saturday, September 25, 2010

Monday, August 9, 2010

गोष्ट एका पिंगूची

पिंगू.... गुगलशोध घेतला तर एक कार्टून... आणि बच्चे कंपनीचा आवडता...

पण माझ्यासाठी मात्र ह्या "पिंगू" ला अतिशय महत्व आहे. सांगतो का? त्याची सुरुवात झाली ती माझ्या सातव्या इयत्तेपासून... त्यामागचं कारण जरा मजेशीर आहे.
कारण असं की चित्रकला ह्या विषयात आम्ही एक क्रमांकाचे "ढ".. आता सांगायला का लाजू की मी चित्रकलेत ढ होतो म्हणून..तर अस्मादिकांना चित्रकलेत पिंगूनेच वाचवलं..
कारण चित्रकलेच्या कुठल्याही पेपरला मी फक्त आणि फक्त "पिंगू" च रेखाटत असे... आणि ह्यावरून आमचा उद्धारही केला गेला.. तरीही माझं पिंगूप्रेम तसूभरही कमी झाल नाही.. उलट वाढलं.
कारण चित्रकलेत काही इतर काढता येत नसल्याने एकमेव पिंगूचे चित्र काढणे आणि चित्रकलेच्या सरांनी मला बदडणे हा एक कॉमन प्रकार चालू होता जवळजवळ २ वर्षे..
पण मला काही कल्पना नव्हती की हाच पिंगू पुढे आयुष्यात येईल म्हणून..असो तेव्हा तरी निदान पिंगूच्या चित्रामुळे कसाबसा का होईना चित्रकला विषयात आपली नाव किनारयाला लागली..


त्यानंतर दहावी आणि पदविका शिक्षण पूर्ण केले आणि मध्यंतरात पिंगूची आठवण पुसट झाली होती.. त्यानंतर प्रपंचासाठी नोकरी शोधणे सुरु झाले आणि मनाजोगते काही मिळेचना.. तरी जे मिळेल ते स्वीकारून वाटचाल करत राहिलो..तेव्हा ३-४ वर्षानंतर, एका मित्राने लिनक्सची ओळख करून दिली.. तेव्हाही माहित नव्हत की तेथे पिंगूची पण वट आहे...नंतर लिनक्स शिकलो सुद्धा... आणि शिकल्यानंतर जेव्हा लिनक्स बद्दल जरा मोठ्या गुरूंकडून माहिती मिळवली.. तेव्हा कळले की टक्स उर्फ पिंगू (आपला पिंगू) लिनक्सच चिन्ह आहे... आणि त्याच लिनक्समध्ये मी आज काम करतो आहे..म्हणजे आता सुद्धा मला पिंगूने माझ्यासारख्या बुडत्याला काडीचा नाही तर भक्कम आधार दिला. ज्याने मला बराच सावरलं.

तर असा हा पिंगू... माझ्या आयुष्यात एक महत्वाचा भाग म्हणून गणला आहे...

Saturday, July 31, 2010

एक सहजसुंदर गाणे

मनरंग" ह्या मराठी अल्बममधील खालील गाणे आणि हे गाणे गायले आहे "हृषीकेश रानडे" ह्याने.. हे गाणे ऐकता ऐकता मी ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो आणि म्हणूनच ही पोस्ट टाकतोय..


चंद्र उमलत्या सरल्या रात्री, थंड धुके हे आले
निळे कवडसे शिळे मालवून, डोळ्याआड बुडाले||ध्रु||

पंख तुटुनिया, शीळ पावरी ओठांवरती पडली
दुखावल्या चोचीतील गाणी, अर्ध्यावरती अडली||१||

किती वेळ हा उभा एकटा, अंधारात इथे मी
प्रथमच माझे शब्द पाहिले, एकांतात इथे मी ||२||

हे गाणे तुम्ही http://www.fileserve.com/file/CnhdDYf दुव्यावरून डाऊनलोड करू शकता...

Sunday, June 13, 2010

माझं गोवा दर्शन

आयुष्यात प्रथमच गोव्याला गेलो होतो आणि तेही फक्त दोन दिवसांसाठी. तरीही जे पाहिले आणि अनुभवले ते इथे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. काही चुकलं तर गोड मानून घ्या..


गोव्याला जाण्याचे कारण म्हणजे शैलेंद्र. हा माझा ऑफिसमधील एक छान सहकारी आणि रुममेट. शैलेंद्र मुळचा गोवेकर आणि त्याला गोव्याबद्दल काही वाईट बोललेलं आवडत नाही. आता बरीच मंडळी म्हणजे जी काही नेहमीच भेटतात त्यांचे म्हणणे एकच "गोवा म्हणजे फेणी आणि धुंद समुद्रकिनारा". त्यातही फेणीचा उल्लेख जास्त आणि घरात तर नेहमीच धाक की गोव्याला जायचं नाही.


हे सर्व उल्लेख केले की शैलेंद्र मला सारखा म्हणणार की हे सर्व चुकीचं आहे. मुळात गोवा निसर्गसंपन्न आहे. माझ्याबरोबर एकदा गोव्याला ये आणि मग बोल. मग मीही अनुमोदन दिलं आणि म्हणालो मला तरी इतरांच म्हणण योग्य वाटत नाही आणि तुझं बोलण खर आहे. एक काम करू येत्या विकांताला जाऊ तुझ्याच घरीगोव्याला.


ठरल्याप्रमाणे शुक्रवारची रात्रीच आम्ही दोघे पुण्याहून निघालो. शनिवारी सकाळी ७:०० वाजता मडगांवला पोचलो. तिथून शैलेंद्रच्या घरी गेलो. तिथे जाताना रस्त्यात माडांची बने आणि हिरवाई बघून बारा तासांचा प्रवासाचा शीण गेला. गेल्या गेल्या प्रथम आन्हिक उरकलं. त्यानंतर नाश्ता म्हणून चक्क ७ डोसे आणि ३ वाट्या चटणीचा फन्ना उडवला. नंतर दुपारी १:०० च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो आणि थेट पोचलो जुन्या गोव्यात. तिथे काही चर्च आहेत.. त्यांची नावे काही आठवत नाहीत बुवा. पण भव्य वास्तू आहेत.


जुना गोवा बघून झाल्यावर आम्ही पणजीला निघालो. पणजीमध्ये मिरामारचा समुद्रकिनारा जो एक शांत समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो.. तिथे जाऊन थोडा वेळ घालवला.. गोव्यात मला असं दिसलं की लोक जगण्याचा आनंद घेतात. गोवेकरांची स्वागत करण्याची पद्धत आणि पाहुण्याशी वागण्याची पद्धत तर मला आवडली. सुशेगात जीवन जगण म्हणजे काय ते अनुभवावे तर गोव्यातच.


गोवा निसर्गसंपन्न आहेच आणि तेथील नियमसुद्धा त्याच्या अनुरूप आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास जर का तुम्हाला गोव्यात घर बांधायचं असेल तर घरासभोवती कमीत कमी ४ नारळाची झाडं हवीत नाही तर घर बांधायला परवानगी मिळत नाही. शनिवारचा एक दिवस जास्त काही पाहता आलं नाही. पण एक चांगला अनुभव मिळाला आणि गोवा म्हणजे नुसती फेणी नाही तर आणखी खूप काही आहे. रात्री रमत गमत घरी गेलो. फक्त सोलकढी आणि भात एवढंच चापून मस्त झोपी गेलो.


दुसरा दिवस रविवार जो सर्वांचा विश्रांतीचा दिवस. ह्या दिवशी जरा आणखी काही नवीन गोष्टी बघण्याचा बेत केला.. पण जास्त काही करता आलं नाही. सकाळी फक्त रामनाथी मंदिर पाहता आले.. इच्छा होती की मंगेशी मंदीर आणि दुधसागर धबधबा पाहावा म्हणून.. पण वेळ नाही.. त्याला मी तरी काय करणार. दोन दिवस सुपरफास्ट गोवा दर्शन करून संध्याकाळी ६:०० वाजता परतीची वाट धरली पुन्हा पुणे..




अवांतर: सध्या मनात एकच प्लान घोळतोय.. तो म्हणजे ट्रेकला जाण्याचा रोहनसोबत.. आणि म्हणूनच ही छोटेखानी पोस्ट टाकतोय..